मुंबई : दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवाजीपार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाचे निमंत्रण जनतेला दिले आहे. ”आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील, तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
“दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या १० वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या दोन वर्षांत सुद्धा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षीदेखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.