शंभर रुपयांमध्ये साखर, तेल देणार होते; गौडबंगाल काय?

मुंबईः राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्याच्या रस्त्यांना तर नद्यांचं स्वरुप प्राप्त झालेलं आहे, शेतीत हातचं पीक वाया गेलंय. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. या सरकारचं राज्यातल्या जनतेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.

आज सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यात होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर अजूनही पाणी आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होतेय.मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे. सरकारने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे. आवश्यक तिथे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न पुरवण्याची सोय केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्या सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप पवारांनी केला.




सरकारने दिवाळीमध्ये स्वस्तात जिन्नस देण्याच्या केलेल्या घोषणेवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सरकारने शंभर रुपयांमध्ये दिवाळी गोड करणार असं सांगितलं होतं. शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार असं सांगितलं. त्याचं ५१३ कोटी रुपयांचं कंत्राटही दिलं पण अजूनही काही हालचाल दिसत नाहीये. या योजनेचं नेमकं काय झालं? नेमकं गौडबंगाल काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने