मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत बच्चू कडू राजकीयदृष्ट्या हतबल.

मुंबई : राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्यानंतर मंत्रिपद हमखास मिळेल, असा आशावाद बाळगून असलेल्या ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे. थेट बच्चू कडूंनी ‘आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन,’ असे वक्तव्य केल्याने त्यांची नाराजीही उघड झाली आहे.बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजप, अपक्ष आणि मित्रपक्षातील काही आमदारांच्या साथीने सत्तास्थापना केली. शिंदे गटाला प्रहारने पाठिंबा दिला. मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. पण, शिंदे यांना सुरूवातीपासून साथ देणाऱ्या बच्चू कडू यांची वर्णी लागली नाही. याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मंत्री करण्याचा शब्द दिला आहे, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. आता बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत चालल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मानाचे स्थान मिळेल, हा कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होत आहे.


बच्चू कडू आणि त्यांचा प्रहार पक्ष हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून बच्चू कडू यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतलेच शिवाय सरकारलाही मागण्या मान्य करण्यास भाग पाडल्याचे वेळोवेळी दिसून आले. शेतकरी, सर्वसामान्यांसाठी लढणारा, सरकारशी दोन हात करणारा नेता, अशी बच्चू कडू यांची प्रतिमा तयार झाली. प्रहार पक्षाचे जाळेही विस्तारले. पण, जेव्हा त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रहार पक्षाची आक्रमकता कमी झाल्याचे  बोलले जाऊ लागले. सरकारमध्ये असताना जर आपले प्रश्न सहजरीत्या सुटत असतील, तर आंदोलनांची गरज काय, असे बच्चू कडू यांचे म्हणणे होते.

सत्तेत राहण्याचे फायदे अधिक असले, तरी अनेकवेळा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. तरीही मंत्रिपदावर राहून लोकांची कामे अधिक प्रभावीपणे करता येतात, हे बच्चू कडू यांच्या लक्षात आले होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांना वऱ्हाडात प्रहार पक्षाचा विस्तार करण्याची संधी मिळाली होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात हमखास मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा प्रहारच्या कार्यकर्त्यांना होती. खुद्द बच्चू कडू यांनी आपल्याला समाजकल्याण, अपंग कल्याण या विभागांमध्ये काम करायला आवडेल, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. आता दुसऱ्या विस्तारात तरी मंत्रिपदाची संधी मिळेल का, अशी साशंकता कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने