आंध्र प्रदेश : ‘भारत जोडो’ यात्रा आंध्र प्रदेशचा चार दिवसांचा टप्पा पूर्ण करून पुन्हा कर्नाटकमध्ये गेली आहे. ही यात्रा रायचूर भागातून दोन दिवसांचा प्रवास करून तेलंगणामध्ये प्रवेश करेल. दक्षिणेकडील यात्रेचे हे अखेरचे राज्य असेल. त्यानंतर ती महाराष्ट्र आणि पुढे भाजपच्या मध्य प्रदेशसारख्या बालेकिल्यातील राज्यांमध्ये जाईल. या राज्यांमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेची खरी ताकद समजू शकेल.काँग्रेस आणि नागरी समाजातून आलेले असे या यात्रेमध्ये दोन प्रकारचे यात्री आहेत. पण, आकर्षणाचे प्रमुख केंद्र अर्थातच राहुल गांधी. देशाच्या ग्रामीण भागात अजूनही गांधी घराण्यातील सदस्याला बघायला लोक रस्त्यावर येतात, पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले दोरखंडाचे सुरक्षाकवच ओलांडून मागे धावतात. सकाळच्या सत्रानंतर अदोनीमध्ये महाविद्यालयाच्या आवारात विश्रांती घेऊन राहुल गांधी यांनी संध्याकाळची पदयात्रा सुरू केली.
राहुल गांधींना पाहायला लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. राहुल गांधींनी हात करून लोकांचे अभिवादन स्वीकारले. मोठ्या शहरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत होते, तसेच राहुल गांधींचे स्वागत आंध्र प्रदेशच्या करनूल जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांनी केलेले दिसले. संसदेत मिठी मारणारे खासदार आणि रस्त्यावर आपुलकीने लोकांना जवळ करणारे राहुल गांधी यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळाला.करनुल जिल्ह्यातील अलूर, अदोनी, मंत्रालयम अशी ही गावे कर्नाटकच्या सीमेवर वसलेली आहेत. कापूस उत्पादनात हा परिसर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी संध्याकाळी मंत्रालयम गावाकडे जाताना राहुल गांधी यांनी पदयात्रा थांबवून कापूस उत्पादकांशी त्यांच्या शेतात जाऊन भेट घेतली. सुमारे ४५ मिनिटे चर्चा केल्यानंतर त्यांनी उर्वरित यात्रा पूर्ण केली. मंत्रालयम हे राघवेंद्र स्वामी मठासाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक महत्त्वाकांक्षी राजकारणी आशीर्वाद घेऊन गेले आहेत. कोणी मुख्यमंत्री बनले तर, कोणी केंद्रात मंत्री. या मठात जाऊन गुरुवारी राहुल गांधी यांनीही आशीर्वाद घेतले.