“अहो नारायण राणे, तुम्ही ३९ वर्ष…”, राणे पिता-पुत्रांची नक्कल करत भास्कर जाधवांचा खोचक टोला!

सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी सातत्याने शिवसेनेविरोधात टीका केल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. या पार्श्वभूमवीर आज ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या चौकशीचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर आणि शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. मात्र, यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्रांची नक्कल करत त्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. तसेच, नारायण राणेंचा त्यांनी ‘कोंबडीवाले’ असाही उल्लेख केला.

“भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना”

नारायण राणेंवरील आरोपांचा संदर्भ देत भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. “या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. त्यांनी रे रोडला एक प्रकल्प उभा केला. त्यात ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, म्हणून किरीट सोमय्यांनी तेव्हा आरोप केले होते. आज मंत्रीमंडळात बसलेले ५० टक्के लोक, मंत्रीमंडळाबाहेर आमदार असणाऱ्या लोकांवर भाजपाकडून असेच आरोप केले जात होते. पण तेच लोक भाजपात गेले आणि एकदम साफ, स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.


नितेश राणेंना टोला!

यावेळी नितेश राणेंचा एकेरी उल्लेख करत भास्कर जाधव यांनी त्यांना टोला लगावला आहे. “काल नितेश राणे चिपळूणमध्ये बोलताना माझ्यावर मनसोक्त टीका करून शेवटी म्हणतो ‘माझं एवढं भाषण ऐकल्यानंतर मी लिहून देतो भास्कर जाधव घरातून बाहेर पडणार नाही, घरात लपून बसेल’. मग आज इथे आलेली ही काय तुमची औलाद आहे का?” असं भास्कर जाधव म्हणाले.

नारायण राणेंची नक्कल

दरम्यान, यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी नारायण राणेंची नक्कल केली. “नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा सवाल भास्कर जाधवांनी नारायण राणेंना केला आहे.“संसदेत केरळचा प्रश्न विचारला की ते तामिळनाडूचं उत्तर द्यायचे. तामिळनाडूचा प्रश्न विचारला की हे केरळचं उत्तर द्यायचे. मग शेवटी ओम प्रकाश बिर्लांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर हे ‘हो’ म्हणतात”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी राणेंचे हावभाव करून दाखवले. “पूर्वी नाथ पै किंवा मधू दंडवते बोलायला उभे राहिले, तर देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहातून जात असतील, तर ते पुन्हा येऊन बसायचे. आता हा बोलायला लागला की सगळे खासदार बाहेर होतात”, असंही जाधव यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने