“त्यांचा बलात्काऱ्यांना पाठिंबा”, बिल्किस बानो प्रकरणावरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; म्हणाले…

दिल्ली: बिल्किस बानो प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ दोषींच्या सुटकेच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन आठवड्यात मान्यता दिल्याचं समोर आलं आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांमधून हा खुलासा झाला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला आहे.



बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकलेला सीबीआय आणि विशेष न्यायालायने विरोध केला होता. मात्र, केंद्रीय गृह विभागाने प्रस्तावावर विचार करताना या सर्व दोषींच्या चांगल्या वर्तणुकीची दखल घेतली आणि त्यानंतर त्यांच्या सुटकेला मंजुरी देण्यात आली, असं सोमवारी गुजरात सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं.यावरून राहुल गांधींनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. “लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी महिला सन्मानाच्या गोष्टी करतात. मात्र, प्रत्यक्षात बलात्काऱ्यांना पाठिंबा देतात. पंतप्रधान मोदींच्या आश्वासन आणि हेतूत फरक आहे. पंतप्रधानांनी महिलांची फसवणूक केली आहे,” असेही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच, तेव्हा जमावाने १४ जणांना ठार केले होते. त्यामध्ये बिल्किस बाने यांच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. दंगलीनंतर दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथे हा गुन्हा घडला होता. या प्रकरणातील ११ दोषींना १८ वर्षांच्या तुरुंगवासानंतर १५ ऑगस्ट २०२२ रोजी गोध्रा कारागृहातून मुक्त करण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने