मुंबई: फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारपरिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “ टाटा एअर बस प्रकल्पाला मी नाशिकात येण्याचीही विनंती केली होती, त्यांना पत्रही पाठवले होते. यानंतर मी पुढे काही करून शकलो नाही, कारण माझा विभाग वेगळा होता आणि नंतर करोनाशी संबंधित घडामोडीही सुरू होत्या. परंतु, एका पाठोपाठ एक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. वेदान्त, विमानाबाबतचा टाटांचा प्रकल्प याशिवाय आणखी काही प्रकल्प गेले. टाटांचं सगळं महाराष्ट्रात आहे, ते कधीही महाराष्ट्राला प्राधान्य देत असतात. पण अचानक काय झालं कल्पना नाही आणि हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले. आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं?, आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा, फटाके उडवा… करायचं काय?, आपण दहिहंडी करत बसलो, करायचं काय? सगळं एवढं शिक्षण होतं, चांगलं होतं. तरी सुद्धा हे प्रकल्प जायला लागले आहेत.”