कोल्हापूर : कोल्हापूर संस्थानच्या शाही दसऱ्याचा थाट देश-विदेशात पोचविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. यंदा हा दसरा जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साजरा केला जात असून, पुढील वर्षी सुमारे एक कोटीहून अधिक निधी त्यासाठी शासन व अन्य माध्यमातून खर्च केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी, सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची परंपरा व करवीर निवासिनी अंबाबाई प्रती असलेली भक्ती यांचा संगम म्हणजे कोल्हापूरचा दसरा आहे.हा दिमाखदार दसरा संपूर्ण भारत व जगासमोर यावा, म्हणून राज्य शासनाने यंदा त्यास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. दरवर्षी हा दसरा सोहळा राज्य शासन दिमाखाने साजरा करेल. त्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी संमती दिली आहे.