मुंबई : दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. परंतु, यशाच्या शिखरावर असतानाच २०१५मध्ये तिला मानसिक आजाराचाही सामना करावा लागला होता. दीपिका नेहमीच मानसिक आजाराबद्दल उघडपणे भाष्य करताना दिसते. एका फाऊंडेशनद्वारे ती याबद्दल जनजागृतीही करताना दिसते.
दीपिकाने नुकतीच अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल होस्ट करत असलेल्या ‘मेघन : डचेस ऑफ सक्सेस’ या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने पुन्हा एकदा नैराश्याबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, “ जेव्हा मी नैराश्याचा सामना करत होते. तेव्हा माझी आई आणि कुटुंबियांनी मला पुर्णपणे साथ दिली. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे, हे लोकांनी आता समजत आहे. यातून बाहेर पडल्यावर आपल्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आहे, अशी भावना येते. परंतु, तुम्ही कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी काही जणांना त्यात वाईटच दिसतं”.
पुढे ती म्हणाली, “जेव्हा मी माझ्या नैराश्यबद्दल, मानसिक आजाराबद्दल भाष्य करते. या परिस्थितीत मला जावं लागलं आहे, असं मी सांगते. तेव्हा लोकांना मी खोटं बोलत आहे, असं वाटायचं. माझ्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी मी हे सगळं बोलत आहे, असं लोकांना वाटायचं. काही लोकांना तर कोणत्या तरी औषधांच्या कंपनीने मला हे सगळं बोलण्यासाठी पैसे दिले आहेत, असंही वाटायचं”.नैराश्यातून बाहेर आल्यानंतर दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसह लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. रणवीर-दीपिका ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. दीपिका ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ती शाहरुख खानसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.