दिवाळीचं आयुर्वेदिक महत्व माहितीये?

 मुंबई : प्रत्येक हिंदू सणामागे काही ना काही शास्त्रीय कारण असतंच. सणासोबत येणारी मजा मस्ती, विविध पदार्थांची चंगळ, विशिष्ट पध्दती, चालीरिती, खाद्य पध्दती या सगळ्यामागे खास अर्थ दडलेला असतो. मग हिंदूंचा सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीला पण विशेष महत्व, अर्थ असणराच. मग, दिवाळीचं आयुर्वेदिक महत्व तुम्हाला माहित आहे?पहाटे लवकर उठून अंगाला तेलाचा अभ्यंग केल्यावर जाणवणारी उब..थंडीत कुडकुडत उटण्याच्या सुगंधात केलेली गरम पाण्याची आंघोळ.. आणि आंघोळीनंतर घरातल्या सर्वानी एकत्र बसून केलेला फराळ! दिवाळीतल्या या दिनचर्येचे वर्णन आयुर्वेदातही आहे. कसे, ते पाहूया या लेखात..त्वचेचं आरोग्य जपणारी ही परंपरा हिवाळ्यात केवळ थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो. आपण सजीव याच सर्व गोष्टींसोबत जगत असतो. त्यामुळे हा कोरडेपणा जसा हवेत वाढतो तसाच आपल्या त्वचेतही वाढतो, आपल्या शरीरातही वाढतो. त्वचा जशी कोरडी होते तसा कोरडेपणा शरीराच्या आतही येतो. आतड्यांना कोरडेपणा येतो. त्यामुळे खाण्यापिण्यात, दिनचर्येत बदल करणं अपेक्षित असतं. उदा. दिवाळीत अभ्यंग, उटणं, फराळ हे बदल त्यादृष्टीकोनातूनच केले जातात.



थंडीत त्वचा कोरडी पडू लागते. कोरडय़ा त्वचेला जीवाणू किंवा बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरडय़ा त्वचेसाठी तेलाचा मसाज आणि उटण्याची आंघोळ फायदेशीर ठरते. पण अभ्यंगाचा आणखी एक उपयोगही सांगितलेला आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना हिवाळा त्रासदायक ठरतो. थंडीमुळे त्वचेच्या वरच्या भागात असलेल्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. ही प्रक्रिया रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरते. त्वचेला तेलाचा मसाज मिळाल्यावर या रक्तवाहिन्या काहीशा विस्तारतात आणि रक्तदाब पूर्ववत होण्यास मदत होते.आयुर्वेदात अग्नी महत्त्व असतं. अग्नी म्हणजे पचनशक्ती . ही पचनशक्ती व्यक्तीपरत्त्वे वेगळी असते. त्यामुळे त्रास होणार नाही, ते सहज पचेल इतपतच फराळाचे पदर्थ खाणं अपेक्षित असतं. आपल्या शरीराला या फराळाच्या पदार्थातून मिळणारी ऊर्जा आवश्यक असते. फक्त फराळाचे पदार्थ खाताना प्रमाणाकडे लक्ष द्यावं. शिवाय सोबत व्यायामालाही प्राधान्य द्यावं.

सणाला रांगोळी काढावी असे आयुर्वेदात कुठे म्हटलेले आढळत नाही. पण रांगोळीचा उपयोग ‘पेंट थेरपी’सारखा होऊ शकतो. मानसिक ताण घालवायचा असल्यास कागद आणि रंग घेऊन मनात येईल ते चित्र काढावे, म्हणजे बरे वाटेल, अशी पेंट थेरपीची संकल्पना सांगितली जाते. सतत घरातले कष्ट उपसून दमलेल्या स्त्रियांना रांगोळी काढून, त्यात रंग भरून बरे वाटते, मन शांत झाल्यासारखे वाटते, तो यातलाच प्रकार असावा. शिवाय रांगोळी मांगल्याचं प्रतिक समजलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने