मुंबई: अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी अद्याप अनेक अपक्ष उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने ठाकरे गटाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही पोटनिवडणूक रद्द करणयात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
तसेच, अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.