उद्धव, रश्मी ठाकरेंसह मुलांच्याही संपत्तीची ED, CBI चौकशी करा; कोर्टात याचिका.

मुंबई : उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच त्यांची दोन्ही मुलं आदित्य आणि तेजस यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय अशा तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचे मानले जाणाऱ्या भिडे परिवाराकडून ही मागणी करण्यात आली आहे. गौरी (३८) आणि अभय भिडे (७८) यांनी ही याचिका दाखल केली आहे. भिडे परिवाराने आणीबाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या साप्ताहिकाची छपाई केली आहे. गौरी सांगतात की, त्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या तत्वाने प्रेरित आहेत. 



या दोघांनी दाखल केलेली ही याचिका संजय गंगापूरवाला आणि आरएम लड्ढा या न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आहे. भिडे दादरचे रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे शिवसैनिकांशी चांगले संबंध आहे.भिडेंच्या या याचिकेमधून महाराष्ट्र सरकारच्या सिडकोच्या मालकीचे जमिनीचे तुकडे जे सामनाचे मालक आणि प्रकाशक असलेल्या प्रबोधन प्रकाशनाकडे आहेत, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्यात आलं आहे. या ट्रस्टची भागिदारी कालांतराने बदलली आणि आता या ट्रस्टची मालकी पूर्णपणे ठाकरेंकडे गेली आहे, असंही या याचिकेत म्हटलं आहे. कोविड काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये ठाकरेंच्या या प्रबोधन प्रकाशनाने ४२ कोटींचा टर्नओव्हर केल्याचं दाखवलं आहे, तसंच यातून ११.५ कोटी फायदा मिळाल्याचंही दाखवलं आहे. त्यामुळे हा सगळा काळा पैसा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

उद्धव, रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी कधीच आपल्या उत्पन्नाचा एक ठोस स्रोत दाखवला नाही. पण तरीही त्यांच्याकडे मुंबई आणि रायगडसारख्या महागड्या भागात मालमत्ता आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. शिवाय उद्धव ठाकरेंनी मार्मिक आणि सामना पेपर छापला पण त्यांनी कधीही त्याचं ऑडिट केलेलं नाही, असंही या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने