सिक्कीममध्ये भूस्खलन; 550 पर्यटक अडकले मदतीसाठी लष्कराला पाचारण.

 सिक्कीम: गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात मुसळदार पाऊस पडत आहे. काही राज्यात पुराने थैमान घातलं आहे. तर आज सकाळी सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 550 पर्यटक अडकले आहेत. स्ट्रायकिंग लायन डिव्हिजनच्या तुकड्यांकडून त्यांना मदत केली जात आहे. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अडकलेल्या पर्यटकांना जेवन,पाणी पुरवण्यात आले आहे.





सोबतच ज्यांची प्रकृती ठीक नाही अशा लोकांना औषधे पोहोचवण्यात आली आहेत. हवामान अजूनही खूपच खराब आहे. लोकांना सुरक्षेशी संबंधित माहितीही दिली जात आहे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे राजधानी गंगटोक आणि त्याच्या लगतच्या भागातील पाणीपुरवठ्यावर खंडीत झाला आहे. तसेच उत्तर सिक्कीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी रस्ता खराब झाल्याने पर्यटक अडकले आहेत.

पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या हिमालयीन राज्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-बांगलादेश सीमा आणि गंगटोकला सिलीगुडीमार्गे जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पूर्व जिल्ह्यातील सिंगताम आणि पाकयोंग जिल्ह्यातील रंगपो दरम्यान खराब झाला आहे. हा महामार्ग सिक्कीम आणि पश्चिम बंगालला जोडतो. ढिगारा साफ करण्याचे काम जलदगतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. केव्हाही येथे आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने