मुंबई: मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. राजकीय आखाड्यात परस्परांविरोधात लढणाऱ्या पक्षांमधील नेते मंडळी क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये युतीमध्ये दिसून आल्याने अनेकांच्या भुवयां उंचावल्या. अशातच, मतदानाला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमोल काळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सर्वाधिक गुणांनी निवडून आले आहेत. या विजयानंतर नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या मतदानासाठी न येण्यावर भाष्य केलं.
माध्यामांशी संवाद साधताना नार्वेकर यांना ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याने मतदानासाठी हजेरी लावली नाही यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. यावेळी “ते नाही आले तरी हरकत नाही. उमेदवारी दिली म्हणून २२१ पर्यंत पोहोचलेलो आहे हे फार महत्त्वाचं आहे.'' अशी प्रतिक्रिया नार्वेकर यांनी दिली आहे.कार्यकारिणी परिषद सदस्यपदाच्या नऊ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांना सर्वाधिक म्हणजे २२१ गुण मिळाले. नार्वेकर पहिल्यांदाच एमसीएच्या कार्यकारणीमध्ये सहभागी होणार आहेत.