मुंबई : शिवसेनेच्या फुटीनंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिंदे गटातील आमदार फुटण्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार फुटणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
"शिंदे गट आणि भारती जनता पार्टी एकच आहे. आम्हाला हे सरकार चालवायचं आहे, आमचा कार्यकाळ पूर्ण करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सध्या शिंदे गटातील आमदार फुटणार असल्याचा दावा करतात पण त्याअगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचेच आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत, आपल्याजवळील आमदार फुटू नये म्हणून ते अशा अफवा सोडत आहेत" असं दानवे म्हणाले आहेत.दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदार फुटणार असल्याच्या अफवा सोडल्या जात आहेत. तर माजी खासदात चंद्रकांत खैरे यांनी आपल्या संपर्कात बरेच आमदार असल्याचा दावा केला होता. पण अजूनही शिंदे गटाकडून एकही आमदार परत ठाकरे गटाकडे गेला नाही. ठाकरे गटातील नेत्यांच्या दाव्याला रावसाहेब दानवे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे.
पन्नास खोके घेतल्याच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - आमदार कडू
अपक्ष आमदार रवी राणा यांनी पन्नास खोके घेऊन शिवसेनेला रामराम ठोकला असा आरोप केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारांना खोके दिले का नाही याचे स्पष्टीकरण द्यावे अशा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. तर रवी राणा यांच्याविरोधात कडू यांनी तक्रार दाखळ केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.