मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस एका मंचावर, किशोरी पेडणेकर म्हणाल्या “मी नेहमीच म्हणते की…”

मुंबई : मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते. दरम्यान, हे तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर आगामी काळात महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास येणार का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील १० वर्षांपासून शिवाजी पार्कवर रोषणाई होते, त्यात काहीही नवे नाही, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.



“शिवाजी पार्कमध्ये मागील १० वर्षांपासून रोषणाई होत आहे. यात नवे काही नाही. मात्र यावेळी तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते एका मंचावर आले. पण मी नेहमीच म्हणते की घर फिरलं की घराचे वासे फिरतात. इथे मात्र वासे अगोदर फिरले आहेत. आता घर फिरवत आहेत,” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मागील दहा वर्षांपासून आमची शिवाजी पार्कवरील दीपोत्सवात येण्याची इच्छा होती, मात्र यायला मिळाले नाही, असे विधान केले होते. त्यावरही किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दहा वर्षांमध्ये यायला भेटले नाही, हे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र मागील दहा वर्षात नेमके काय मिळवले, हे त्यांनी सांगितले नाही. मतदारांना हे किती पटत आहे, हे दिसत आहे. त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणून देत. मी त्यावर काहीही बोलणार नाही. त्यांना काय टोलेबाजी करायची ती करू द्या,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“राजकारणाचे एवढे अध:पतन होईल असे कोणालाही वाटले नव्हते. नगरसेवक फुटणे, आमदार फुटणे, गट फुटणे हे जगात तसेच देशातही घडते. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे तरुण पिढीने, सुशिक्षित लोकांनी राकारणात येऊ नये, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र या समजाला आदित्य ठाकरे नक्कीच छेद देतील. त्यांच्या चांगल्या वागणुकीने ते चांगला आदर्श निर्माण करत आले आहेत,” असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आदित्य ठाकरे यांची सुत्ती केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने