नागपुरातील संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे कारण काय?

 

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्यासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. या आंदोलनामागे मोर्चेकरी संघटनांना त्यांचे कार्यक्रम घेण्यास भाजप प्रणित हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारने आणलेल्या आठकाठीचा आक्रोश हे प्रमुख कारण असल्याचे समजते.

भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांनी ६ ऑक्टोबरला म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर येथे लाखोंचा जनसमुदाय येतो. यामुळेच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती व न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. तरीही गुरुवारी (६ ऑक्टोबर) दलित बहुल उत्तर नागपुरात मोठ्या संख्येने नागरिक संघ मुख्यालयाकडे कूच करण्यासाठी रस्त्यावर आले.

मोर्चा आयोजक संघटनांनी हरियाणा येथे २७ जून २०२२ ला डीएनए परिषदेचे तर बामसेफ व राष्ट्रीय मूल निवासी संघाने २१ ऑगस्ट २०२२ रोजी उत्तर प्रदेशात राज्य अधिवेशन आयोजित केले होते. पण तेथील भाजप प्रणित सरकारने ते होऊ दिले नाही. एवढेच नव्हेतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, असा आरोप आहे. या घटनांमागे संघाची विचारसरणी कारणीभूत आहे. ही बाब संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकाराचे हनन करणारी आहे. त्यामुळे भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवायचा, असे नियोजन होते. यामागे धम्मचक्र प्रवर्तन दिनी होणाऱ्या गर्दीवरही आयोजकांचा डोळा होता. या माध्यमातून आपला मुद्दा रेटून नेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता असे एकूण घडामोडींवर नजर टाकल्यास दिसून येते.



नागपूर हे दीक्षाभूमीमुळे परिवर्तनाची भूमी म्हणून तर संघ मुख्यालयामुळे उजव्या विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. उजव्या विचारसरणीच्या केंद्रावर परिवर्तनवादी विचाराच्या नागरिकांनी मोर्चा काढल्याने तो राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने