“’ईडी’सरकारने १०० दिवसांत महाराष्ट्राची नाही तर…”; नाना पटोलेंचा शिंदे सरकारवर घणाघात

 मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले आहेत. या १०० दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच शेतकरी आत्महत्या, महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव यावरूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.



“राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ‘ईडी’ सरकारने १०० दिवसांत केले”,अशा घणाघाती नाना पटोले यांनी केला आहे.

“अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप पंचनामे झाले नाहीत. थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आमच्या सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर ५० टक्के कमी करावे, अशी मागणी करणारे आता मूग मिळून गप्प बसले आहेत. सीएनजी पीएनजीवरचे कर आमच्या सरकारने कमी केले पण या सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत. उलट सीएनजी ८४ रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केले. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे” , अशी टीकाही नाना पोटोल यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने