मुंबई: एक गठ्ठा दलित मतांची ताकद सत्तेच्या राजकारणापासून वंचित राहिलेल्या इतर सामाजिक घटकांतील व्यक्तींच्या मागे उभी करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा “अकोला प्रारूप” चा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवणारे अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने नवी समीकरणे जुळवून आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेसोबतच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसकडेही युती-आघाडीसाठी वंचितने प्रस्ताव पाठवला आहे. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, तर काँग्रेसने अद्याप थेट भूमिका जाहीर न करता नेहमीच्या “थांबा आणि प्रतीक्षा करा”या नीतीने वंचितला अधांतरी ठेवले आहे. त्यामुळे वंचितने स्थानिक पातळीवरही एखाद्या नेत्यासोबत आघाडीचा पर्याय ठेवल्याची माहिती आहे.
औरंगाबादमध्ये वंचित व एमआयएम यांच्या आघाडीमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची सद्दी संपुष्टात आली. अनपेक्षितपणे इम्तियाज जलील हे खासदार झाले. पण पुढे काहीच दिवसात वंचित व एमआयएम यांच्यात काडीमोड घडून आला. वंचितला एका राजकीय मैत्राची गरज निर्माण झालेली असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्या पक्षाचे धनुष्यबाणाचे चिन्हही हातून निसटले. या सर्व राजकीय घडामोडी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असतानाच गतिमान झाल्या. त्यात मुंबई मनपा ताब्यात मिळवण्यासाठी भाजपने लावलेला जोर, राज ठाकरेंशी वाढत ठेवण्यात येत असलेली जवळीक पाहता अॅड. आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे नव्याने शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.