मुंबई : एकामागून एक मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. त्यावरुन सध्या राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधक ताशेरे ओढत आहेत. राज ठाकरे यांनीही आज थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.''पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान महत्त्वाचं पाहिजे. मात्र प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच कसा जातो? इकडे मी जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा मला संकुचित म्हटलं जातं.''
राज ठाकरे पुढे म्हणाले की, प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटलं नसतं. जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. प्रत्येक गोष्ट गुजरातला जात असेल तर दुर्दैव आहे. पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. प्रत्येक राज्यातल्या लोकांना आपलं घर सोडून परराज्यात जाण्याची गरज पडू नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
चार-पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आज केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पुण्यातल्या रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा त्यांनी केली. सीडॅकचा इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग प्रकल्प रांजणगावमध्ये येणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून २ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ हजार रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे.