मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या चर्चेवर खुद्द भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रासंदर्भात मला काहीच माहिती नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
भाजपाचे उमेदवार असलेल्या पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुर असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे. ते (पत्र) मी बघितलेलं नाही. मी सकाळपासून प्रचारात होतो. आमचे वरिष्ठ नेते त्याबद्दल बोलतील. मी बोलणं बरोबर ठरणार नाही. मी अंधेरीचा एक छोटा कार्यकर्ता आहे. अंधेरीमध्येच काम करतो. वरच्या लेव्हलला काय सुरु आहे मला माहिती नाही. अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी दिली आहे.तसेच, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आठवलेंची आरपीआय या तिन्ही पक्षांची युती असून ती भक्कम आहे. असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काय म्हटलं होते पत्रात राज ठाकरेंनी?
'आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याच निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेता भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा,' अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार होण्यानं रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,' असं राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.