कोल्हापूर : भाजपपासून आधीच काडीमोड घेतलेली आणि महाविकास आघाडीला रामराम ठोकलेला. अशा परिस्थितीत राजकीय अस्तित्वाचा शोध शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी चालवला आहे. ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाची हाक देऊन त्यांनी पुन्हा शेतकरी संघटनेची बांधणी करून राजकीय अस्तित्व भक्कम करण्याचा प्रयत्न चालवला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांच्या वाढत चाललेल्या राजकीय प्रगतीला खीळ बसली. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पहिल्याच लढतीत शेट्टी यांचा पराभव करून त्यांचा ‘ शिवार ते संसद’ हा प्रवास शिवारातच रोखला. तेव्हा शेट्टी यांना महाविकास आघाडीची सोबत नडली असा निष्कर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढला गेला. महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये शेट्टी यांचा समावेश केला होता. या यादीची मान्यता लांबत चालली होती. अखेर शेट्टी यांनी आमदारकीही नको आणि राज्य सरकारमध्ये राहायलाही नको, असे म्हणत एकला चलो रे मार्ग निवडला.
पुन्हा चळवळीचे रान
ऊस परिषदेत स्वाभिमानी संघटना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेट्टी यांनी लोकसभा लढवून जिंकली पाहिजे, असे वारंवार सांगत राहिले. त्यावर शेट्टी यांनी भाष्य केले नाही. पण शेतकरी संघटनेची बांधणी करण्याच्या निमित्ताने साखर कारखानदार आणि राज्य शासन यांच्या विरोधात संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य शासनाने उसाच्या एफआरपीची मोडतोड केली आहे. साखर कारखान्यातील काटेमारीवर साखर आयुक्त नियंत्रण ठेवत नाहीत, असा मुद्दा घेऊन त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात रान पेटवण्याची भूमिका घेतली आहे.