कोल्हापुरात ‘कर्नाटक भवन’ उभे करू देणार नाही ; संजय पवार.

 कोल्हापूर : कर्नाटक राज्य शासनाचे ‘कर्नाटक भवन’ कोल्हापुरात उभे करू दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. कर्नाटक भवन कोल्हापुरात उभे करणे म्हणजे सीमालढ्यात हुतात्मा झालेल्यांवर अन्याय असून, ५० वर्षे सीमालढा देणाऱ्या महाराष्ट्रवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.



पवार म्हणाले, ‘कर्नाटक भवनच्या प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कर्नाटक सरकारने देशभर पसरलेल्या कन्नड बांधवांसाठी अनेक ठिकाणी भवने बांधली आहेत. त्यापैकी बांधण्यात येणारे हे एक भवन असेल. विशेष म्हणजे इथल्या मठाद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात.

त्याचा फायदा शेतकऱ्यांसह अनेकांना होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांसह शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जरी हे कर्नाटक भवन बांधण्यात येणार असले तरी देखील कर्नाटकात ५० वर्षापेक्षा जास्त काळ मराठी भाषिकांवर कन्नड भाषा शिकण्याची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करू दिली जात नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला जातो, हे दुर्दैवी आहे. मठाच्या कुठल्याही विधायक कामाला आमचा विरोध नाही. पण, ‘कर्नाटक भवन’ उभारू दिले जाणार नाही.’पत्रकार परिषेदस विजय देवणे, रविकिरण इंगवले, विनोद खोत, राजू जाधव, रणजित आयरेकर, शशिकांत बीडकर, दिनेश साळोखे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने