“आता गुजरात एक वेगळा देश होणार आहे का?”

मुंबई: एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीवर खापर फोडत असताना विरोधकही सरकार केंद्र सरकाविरोधात आवाज उठवला जात नसल्याचा आरोप करत आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही सरकारवर टीका केली असून इतर राज्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.



“डायमंड उद्योग आधीच सूरतला आहे. गुजरातमध्ये बऱ्यापैकी या उद्योगाने जम बसवला आहे. सराफा व्यापारही तिथे स्थलांतरित होत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचं इंटरनॅशन ट्रेडिंग गुजरातमधून करण्याची भूमिका घेतली जात आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता गुजरात एक वेगळा देश होणार आहे का? अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली आहे,” असं सतेज पाटलांनी म्हटलं आहे. “देशातील सगळी संपत्ती एका राज्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असून, ते इतर राज्यांसाठी अन्यायकारक आहे,” असंही सतेज पाटील म्हणाले आहेत.भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी हा समारंभ होणार आहे.

‘‘या प्रकल्पातून भारतीय हवाई दलासाठी विमानांची निर्मिती होईल. तसेच तेथे तयार झालेल्या विमानांची निर्यातही होणार आहे. यामुळे भारतीय विमाननिर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे,’’ असे संरक्षण सचिव अजयकुमार यांनी सांगितले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस कंपनीशी २१ हजार कोटींचा करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या अ‍ॅवरो-७४८ विमानांची जागा सी-२९५ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. बडोद्यातील हा प्रकल्प २१,९३५ कोटी रुपयांचा असून येथे तयार होणारी विमाने प्रवासी वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकतात, अशी माहिती कुमार यांनी दिली. विमानाच्या ९६ टक्के भागांची निर्मिती भारतात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यात सध्यातरी विमानाच्या इंजिनाचा समावेश नाही.

देशातील असा पहिला प्रकल्प

सी-२९५ विमानांचा पहिला ताफा (१६ विमाने) सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या काळात स्पेनच्या सेविले येथील कारखान्यातून मिळणार आहे. उर्वरित ४० विमाने ही टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-२९५चे उत्पादन होण्याचीदेखील ही पहिलीच वेळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने