“शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे नवं निवडणूक चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आयोगाने मंजूर केलं आहे. आयोगाच्या या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्याकडे बहुमत असून ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला मिळायला हवं होतं असं विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ हे नाव दोन्ही शिंदे गटाला मिळालं तर काय असा प्रश्न विचारण्यात आला.



शिंदे काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची नावं निश्चित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंनी, “हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक आहे. धनुष्यबाण चिन्हं बहुतमच्या आधारे आम्हाला मिळायला हवं होतं. आमच्याकडे ७० टक्के बहुतम आहे. आमचा चिन्ह आणि पक्षासंदर्भातील दावा कायम आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली होती.

आदित्य काय म्हणाले?
याचसंदर्भात आदित्य यांना ‘मुंबई तक’वरील विशेष मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेलं तरी तुमची लढण्याची तयारी आहे का? कारण निवडणूक आयोगाचा संपूर्ण निर्णय अद्याप लागलेला नाही. सध्या देण्यात आलेला निर्णय हा अंतरिम निर्णय आहे,” असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “काय होतं हे बघणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार यांच्याबद्दल राहिलेला नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेसंदर्भात आहे. न्याय होणार आणि आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. संविधान आणि लोकशाहीबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मला वाटतं की फक्त देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे,” असं अदित्य म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने