शाळा बंद करु नका...बीडच्या लहानग्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बीड : जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल. अशा आशयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित बीडच्या लहानग्याने शाळा बंद करु नका अशी कळकळीची विनंती केली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले.यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली. या पत्रानंतर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



काय म्हटले आहे पत्रात?


''मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र,

पत्र लिहिल्यास कारण की,

साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल.

म्हणून तुम्हाला माझी कळकळीच विनंती आहे की माझी शाळा बंद करू नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणि आते आहे.

आम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दूसरीची मुले आहोत मग आम्ही कसे जायचे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, माझी शाळा बंद करू नका. माझं गाव डोंगरांच्या कुशीत वसलेल आहे.

- समाधान बाबासाहेब जायभाये''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने