‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि देसाईंवर गंभीर आरोप; म्हणाले “मातोश्रीला किती टक्के…”

मुंबई:  ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर आता ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकल्पही गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री आणि महाविकास आघाडीवर फोडलं असून, सुभाष देसाई यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले आहेत?

“महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. २१ सप्टेंबर २०२१ मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे,” असं प्रसाद लाड यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.“येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठं प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला.



“आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झालं आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांचं पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावं,” असा सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे. वेळ पडल्यास पुरावे समोर आणू असंही ते म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने