मुंबई: महाराष्ट्रातल्या नेत्यांनी टीका करताना पातळी सोडून टीका करू नये, असं सांगत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर विविध पक्ष एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद शिगेला पोहोचले आहेत. अशातच उदय सामंत यांनी ट्वीट करत हे आवाहन केलं आहे.
काय म्हणतात उदय सामंत?
आपल्या ट्वीटमध्ये उदय सामंत म्हणतात, "महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो, राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते. परंतु टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती.गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात टीकाटिप्पण्यांना उत आला आहे. दसरा मेळाव्यापासूनच या सगळ्याला सुरुवात झाली आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन गटांमधले नेते सातत्याने एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. भास्कर जाधव आणि राणे बंधू यांच्यातला संघर्ष सध्या ताजा आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचा रोख नक्की कोणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.