“राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता”, संजय राऊतांचे विधान

मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून मार्गक्रमण करत शुक्रवारी हिंगोलीत दाखल झाली होती. या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी दोन तरुण नेत्यांनी गळाभेट घेतली.



दरम्यान, भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत”, असे विधान त्यांनी काँग्रेसच्या यात्रेदरम्यान केले आहे.“लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “आम्ही सगळे लंबी रेस के घोडे आहोत. जोपर्यंत कारवा सुरू आहे तोपर्यंत आम्ही चालत राहू”, असा निर्धार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. देशात खरं बोलणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने