मुंबई : बॉलीवूडच्या चित्रपटांना पुन्हा एकदा दणका देत आपल्या चित्रपटाची साऱ्या देशभरात दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या कांताराची नावाची मोठी चर्चा सुरु आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटानं वेगळाच ट्रेंड सेट केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऋषभच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याची चर्चाही आहे. त्यामुळेच की काय राजकीय व्यक्तींना देखील या चित्रपटाच्या कौतूकाचा मोह आवरलेला नाही.
आचार्य श्री श्री रविशंकर यांनी देखील कांताराचे कौतूक केले होते. त्यांनी या चित्रपटाला मास्टर क्रिएटिव्हिटी असे म्हटले होते. एका आगळ्या वेगळ्या विषयांवर आधारित या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकीकडे टिपिकल विषयांवरील चित्रपटांची सद्दी सुरु असताना त्यात कांतारानं प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यत अनेकांना दखल घेण्यास भाग पाडले आहे. भूतकोला परंपरा, त्याचे महत्व, त्याची परंपरा, त्याचे वैशिष्ट्य याच्याशी संबंधित असणारी मानवी मुल्य यांची जोडणी कांताराशी करण्यात आली आहे.
आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील शेट्टीच्या कांताराचे कौतूक केले आहे. बंगळुरुमध्ये त्यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावेळी प्रेसशी बोलताना हा चित्रपट म्हणजे एक ऐवज असून त्यानं आपली परंपरा, संस्कृती यांचे जतन करण्याचे काम केले आहे. त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. सध्या देशभरातून कांतारावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. तो त्याला पात्र आहेच. मानवी मुल्य, त्यात होणारे संघर्ष आणि धार्मिकता यांची योग्य सांगड कांतारातून घालण्यात आली आहे.कांतारा हा वेगळ्या प्रकारे आपले मनोरंजन करतो. आपल्याशी संवाद साधू पाहतो. तेव्हा त्या चित्रपटाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिले गेले पाहिजे. असे सीतारामन यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ऋषभनं आपल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करु नये असे सांगून एक मोठा धक्का दिला होता.