स्वाभिमानीचे राज्यभर होणारे चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

जयसिंगपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक निश्चित झाल्याने स्वाभिमानीने शुक्रवारी (ता. २५) राज्यभर होणारे चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास ३ डिसेंबरला पुन्हा राज्यात ताकदीने चक्काजाम करण्याचा इशाराही सरकारला दिला आहे.शुक्रवारी(ता. २५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरोळ, हातकणंगले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कर्मभूमी असलेल्या शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्र्यांचे आगमन होत आहे. दरम्यान एकरकमी एफआर मिळावी, वजनकाटे ऑनलाइन करावेत, गतवर्षी तुटलेल्या उसाचे प्रतिटन दोनशे रुपये मिळावेत, वाहनधारक व मजूर महामंडळामार्फत पुरविण्यात यावेत या मागण्यासाठीस्वाभिमानीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी श्री. शेट्टी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मंगळवारच्या बैठकीचे नियोजन केले. शुक्रवारचा चक्काजाम आंदोलन मागे घेण्याचीही विनंती केली होती. ंमंगळवारच्या बैठकीत ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




... तर सरकारची कोंडी

ऊस प्रश्नावर याआधी स्वाभिमानीच्या आंदोलनावेळी सरकारने चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र, दोन्ही वेळा सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करताना शेट्टी यांनी यावेळी फसवणूक झालीच तर पुन्हा राज्यभर आंदोलनाचेही नियोजन करत सरकारची कोंडी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने