“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला”, चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका; म्हणाले, “आता सत्तेत…”

सातारा : शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोना केला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. ते साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.



“राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघणे सोडले पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी त्यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे जादूटोना करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले. हा जादूटोना राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र आता आम्ही सतर्क झालो आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा विचार आता करू नये”, अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. दरम्यान, जादूटोना करणारे भोंदूबाबा कोण? असे विचारले असता, “शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही”, असेही ते म्हणाले

यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार नाराज असल्याच्या बातम्यांसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. “अजित पवार हे नेमके काय करतील, हे कोणालाच कळू शकत नाही. ते काय बोलतात आणि काय करतात, हे अजित पवार यांनाच माहिती असतं”, असेही ते म्हणाले.दरम्यान, तपास यंत्राण या केंद्र सरकाच्या पाळीव प्राण्याप्रमाणे काम करतात, अशी टीका सामनातून करण्यात आली होती. त्यालाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. “उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर मैत्री केली, तेव्हापासून अशा विधाने हजारवेळा आली आहेत. त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचं याचा विचार सर्वांनी केला पाहिजे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. केवळ माध्यामात जागा मिळवण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत. सत्ता गेल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने