ठाकरेंनी एका उत्तर भारतीयासाठी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला पण... 'या' नेत्याचा आरोप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तयार झालेल्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेत झालेलं खच्चीकरण बोलून दाखवलं आहे. ठाकरे गट सोडून जाताना कीर्तिकर यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले की, 2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बिल्डरला तिकीट देण्यासाठी माझा पत्ता कापला जाणार होता. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला तिकीट मिळालं, असा आरोप कीर्तिकर यांनी केलाय. कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केलाय. बोलताना ते म्हणाले की, मी गेली 56 वर्ष शिवसेनेसोबत आहे. ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून मला बिरुदावली मिळाली. व्हि के सिंह नावाचा उत्तर भारतीय बिल्डर आहे. त्याचा भाऊ रमेश सिंह याला तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बिल्डरची बोलणी सुरू होती. त्यांच्यात काय सुरू होतं मला माहीत होतं. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिलं नाही. मला तिकीट दिलं, असा खळबळजनक आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.



पुढे बोलताना ते म्हणाले की, मला बाळासाहेबांनी चौथ्यांदा तिकीट दिलं होतं त्यानंतर 2009 मध्ये माझा पत्ताच कट केला. मला उमेदवारीही दिली नाही. माझा पीए सुनील प्रभू त्याला बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. कीर्तिकरांना तिकीट देणार नाही. त्यामुळं तू कामाला लाग असं सांगितलं गेलं. इतका मोठा पक्षप्रमुख असा विचार करतो? असंही पुढे कीर्तिकर म्हणालेत.सेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. आम्ही अपमान सहन करत होतो परंतु आम्ही शिवसेना सोडून गेलो नाही. आमचा अपमान होत होता. 2019ला आम्हाला मंत्रिपद मिळालं. पण ते अरविंद सावंतला दिलं. त्यांच्या खासगी आणि मर्जीतल्या माणसाला दिलं. तेव्हा का शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आठवला नाही? गजानन कीर्तिकर का आठवला नाही? असा प्रश्नही त्यांनी त्यावेळी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने