“…म्हणून मी मांसाहार करणं बंद केलं” अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी’मध्ये सांगितले कारण

मुंबई : सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे १४ वे पर्व सुरु आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमाची ओळख बनले आहेत. शोच्या नव्या भागामध्ये त्यांच्यासमोर हॉटसीटवर बोईसरमध्ये राहणाऱ्या विद्या उदय रेडकर बसल्या होत्या. या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अमिताभ आणि विद्या ‘केबीसी’च्या खेळादरम्यान गप्पा मारत असल्याचे दिसते. तेव्हा बच्चनसाहेबांनी जया यांना मासे खायला फार आवडतात असे सांगितले.



अमिताभ बच्चन पहिल्या पर्वापासून ‘केबीसी’मध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करत आहेत. या बुद्धीचातुर्याच्या खेळामध्ये समोर बसलेल्या स्पर्धकाचे मनोबल वाढवे म्हणून ते त्यांच्याशी निरनिराळ्या गोष्टींवर सहज गप्पा मारत असतात. अनेकदा अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्यामधले जास्त लोकांना माहीत नसलेले किस्से स्पर्धकांना सांगून मोकळे होतात. कार्यक्रमाच्या नव्या भागात त्यांनी विद्या रेडकर यांच्यासह मांसाहार या विषयावर गप्पा मारल्या.

तेव्हा अमिताभ यांनी त्यांना ‘तुम्हाला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो?’ असे विचारले. त्यावर विद्या यांनी ‘मला मांसाहार करायला आवडतो. त्यामध्ये मासे मला फार प्रिय आहेत’ असे सांगत पुढे ‘जया बच्चन यांना सुद्धा मासे आवडतात ना?’ असा प्रतिप्रश्न केला. त्याला अमिताभ यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी ‘तुम्हालाही मासे खायला आवडतात का’ असा सवाल केला. त्यावेळी त्यांनी ‘मी मासे खाणं खूप आधीच बंद केलं आहे. बरेचसे पदार्थ खाणं सोडलं आहे.’ असे विधान केले. पुढे ते म्हणाले, “मी तारुण्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. वय झाल्यापासून मांसाहार न करण्याचा मी निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोड खाणं सोडलं आहे. भात, पान आणि अजून बऱ्याचशा गोष्टी खाणं मी आजकाल टाळतो. जाऊ द्या मी आता पुढे बोलतं नाही.” केबीसी व्यतिरिक्त ते सध्या त्यांच्या ‘ऊंचाई’ या चित्रपटाच्या कामांमध्ये व्यग्र आहेत. मागच्या महिन्यामध्ये त्यांचा ‘गुड बाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने