पॅरिस: तापमानवाढ रोखण्यासाठी पॅरिस येथील परिषदेत निश्चित केलेले दीर्घकालिन उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्व प्रकारातील जैविक इंधनाचा वापर टप्प्याटप्प्यांत बंद करणे आवश्यक आहे, असे ठाम मत भारताने हवामान बदल परिषदेत मांडले. या परिषदेसाठीचा अंतिम मसुदा तयार करण्याचे काम सुरु झाले असताना भारताचा आग्रह महत्त्वाचा मानला जात आहे.एका सत्रात भारताच्या शिष्टमंडळाने भूमिका मांडली. कोळशाचा वापर कमी करण्याचा भारताला आग्रह होत असताना भारताने मात्र, ‘नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वापरातूनही हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे एकाच इंधनाचा वापर बंद करण्याचा आग्रह करण्याची गरज नाही,’ असे स्पष्टपणे सांगितले. या मुद्यावर येत्या आठवड्यात जोरदार चर्चा अपेक्षित आहे.
‘‘पॅरिस करारातील उद्दीष्ट्ये निश्चित करण्यात आली होती. ही उद्दीष्ट्ये पूर्ण करायची असल्यास सर्व प्रकारच्या जैविक इंधनाच्या वापरावर टप्प्याटप्प्यांत बंदी आणणे आवश्यक आहे. काही इंधनांना हानिकारक म्हणायचे आणि काही इंधनांच्या वापरातून हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत असले तरी त्यांना ‘हरित आणि शाश्वत’ म्हणायचे, हे विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर टिकू शकत नाही. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम पदार्थांसह सर्व प्रकारच्या जैविक इंधनांच्या वापरातून हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते,’’ असे भारतीय शिष्टमंडळाने सांगितले.
परिषदेतील इतर घडामोडी
शांततेसाठी पर्यावरण या मोहिमेला सुरुवात
आफ्रिकेला २.५ कोटी डॉलर पुरविणार
२०३० पर्यंत तीस उद्दीष्ट्ये साध्य करण्याचा निर्धार
तापमानवाढीमुळे कृषीवर विपरित परिणामाची टीका
तीव्र बदलांचा आफ्रिकेला सर्वाधिक फटका बसत असल्याने उपाययोजनांवर चर्चा
भारताची भूमिका
पॅरिस करारानुसार निश्चित केलेल्या जबाबदारीची अंमलबजावणी व्हावी
कार्बन कमी करण्यासाठीचा निधी निश्चित करा
सर्व प्रकारच्या जैविक इंधनाचा वापर थांबवावा