अफजल खान मुस्लिम होता म्हणून..; सरकारचं कौतुक करत उदयनराजेंनी दिली स्पष्ट प्रतिक्रिया

सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी  बांधलेल्या प्रतापगड  किल्ल्याजवळ अफजलखानाची  कबर आहे. या थडग्याभोवती बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं. गुरुवारी सकाळपासून हे बेकायदेशीर बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. राज्य सरकारच्या वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.



या कारवाईनंतर खासदार उदयनराजे भोसले  यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्वांना मान-सन्मान दिला. महाराजांनी त्यांच्या शत्रूसाठी देखील कबर बांधली. आपल्या शत्रूसाठी असे आजवर कोणीही केलं नाही. मात्र, या कबरीभोवती मागील काळात काही लोकांनी अतिक्रमण केलं. हे अतिक्रमण तोडून ही कबर खुली करायला हवी. त्यामुळं त्या कबरी मागचा इतिहास येणाऱ्या पिढीला कळू शकेल. अफजल खान मुस्लिम होता म्हणून ही कारवाई केली असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये, असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं.

उदयनराजे पुढं म्हणाले, आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतो, त्यामुळं कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळं या कारवाईला धार्मिक आणि राजकीय रंग देणं चुकीचं आहे. जी गोष्ट कायद्याच्या विरोधात आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अनेक संघटना ही कबर पूर्णपणे हटवण्याची मागणी करत आहेत. मात्र, तसं होऊ शकत नाही. कारण, शिवाजी महाराजांनी काही विचार करूनच ही कबर बांधली असावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी इंग्लंडमधील जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावर उदयनराजे म्हणाले, जगदंबा तलवार भारतात यावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. ब्रिटिशांनी दुसऱ्या देशातून आणलेल्या वस्तू मोठं मन दाखवून त्या देशांना परत करायला हव्यात, असं त्यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने