मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका सातत्याने होत आहे. आतापर्यंत जवळपास पाच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. आजच ऊर्जा उपकरण प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती हाती येत आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कुठलाही प्रकल्प तीन चार महिन्यात येतो आणि जातो नाही ती काही जादूची कांडी नाही. आरोप कोणीही करू शकतं. आमचं सरकार उद्योगांना चालना देणारं आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल की आम्ही गेल्या तीन महिन्यात काय केलंय. आणि अडीच तीन वर्षांत काय झालं तेही दिसेल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला आश्वासन दिलंय की मोठ्या प्रमाणावर उद्योग देऊ, रोजगार निर्मिती होईल आणि दोन लाख कोटी २२५ विकासकामांसाठी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार"