“आम्ही सरकारचं स्वागत करतो, पण…” अफझलखानच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर संभाजी छत्रपतींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कोल्हापूर : राज्य सरकारने अखेर प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी स्वागत केलं आहे. अफझल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्याने आम्ही सरकारचं स्वागत करतो, पण आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारने इतरही किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




संबंधित ट्विटमध्ये संभाजी छत्रपती म्हणाले, “मरणानंतर वैर संपतं, या भावनेतून शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाची कबर बांधली होती. पण अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझल खानाचं उदात्तीकरण केलं. त्यांनी अफझल खानाच्या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला. याबाबत न्यायालयाने अनेकदा आदेश देऊनही हे अतिक्रमण हटवण्याचं धाडस कोणत्याही सरकारने केलं नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचं स्वागत करतो.”

संभाजी छत्रपती आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणाले की, सरकारच्या या कार्यवाहीने चांगली सुरुवात झाली आहे. पण केवळ प्रतापगडचं नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलं आहे. विशाळगड हे एक त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. लोहगड, मलंगगड, चंदन वंदन सारख्या अनेक किल्ल्यांवरदेखील अतिक्रमणं वाढली आहेत. सरकारने याकडे डोळेझाक केल्यानं गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात होत आहे.“या धाडसी निर्णयमुळे शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. संबंधित किल्ल्यांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने हटवावीत. यासाठी सरकारला आमचं सहकार्य राहील” असंही संभाजी छत्रपती ट्वीटवर शेअर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने