खरगोनमधील भारत जोडो यात्रेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान  मोठा वाद समोर आलाय. यात्रेदरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केलाय.मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्हीडी शर्मा  यांनी एक व्हिडिओ ट्विट करून हा आरोप केलाय. खरगोनमध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींच्या  भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, काँग्रेसची देश तोडण्याची मानसिकता आता उघडकीस आलीय, असं ट्वीटमध्ये नमूद केलंय.



मध्य प्रदेश भाजपचे मीडिया प्रभारी लोकेंद्र पराशर यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिलं की, 'खरगोनमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून हे ट्विट करण्यात आलं आणि नंतर ते काढून टाकण्यात आलं. मात्र, काँग्रेसच्या मनात काय आहे हे सत्य समोर आलं आहे.'यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश  यांनी ट्विट केलं की, 'भाजपच्या डर्टी ट्रिक्सनं संपादित केलेला व्हिडिओ प्रचंड यशस्वी झाला. हा व्हिडिओ #BharatJodoYatra ला बदनाम करण्यासाठी प्रसारित केला जात आहे. यावर आम्ही तातडीनं कायदेशीर कारवाई करत आहोत.

भाजपच्या आरोपांचं खंडन करताना मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा म्हणाले, “आम्ही यात्रेदरम्यान अशी कोणतीही घोषणा ऐकली नाही. राहुल गांधींच्या समर्थनार्थ हजारो लोक बाहेर पडताना पाहून भाजपला धक्का बसला आहे. याउलट संघ आणि भाजपची विचारधारा असलेल्या कुणाला तरी या षडयंत्रासाठी रॅलीत पाठवलं गेलं असावं, असा आरोप मिश्रा यांनी केलाय. लोकेंद्र पराशर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने