‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठाकरे गटाकडून टीका, म्हणाले “अर्थात, म्हणजे…”

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर भाष्य केलं. यावेळी ‘बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते’, अशी माहिती दिली. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याआधी भाजपाने बंडखोरीशी पक्षाचा काही संबध नसल्याचे दावे केल होते. दरम्यान ठाकरे गटही यानंतर आक्रमक झाला असून प्रतिक्रिया देत आहे. ठाकरे गटातील नेते अनिल देसाई यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं.



राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. त्याआधी अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरील टीका तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपा नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी चालवलेले सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका याचं वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र असंच करता येईल अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले की, स्वत: कुठेतरी कथानक लिहित आहेत. खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न होत आहे. कोण राजा, कोण राजपुत्र, कोणी जनतेत जाऊन काम केलं हे सर्वांना दिसत आहे. कोण विलासी आहे याचंही दर्शन जनतेला घडत आहे.

“त्यांना सर्व स्वातंत्र्य असून कशासाठीही बांधील नाहीत. महागाई, बेरोजगारी याकडे यांचं लक्ष नाही. जनतेने जर उद्या हे प्रश्न उपस्थित केले तर त्यांनाही ते विलासी म्हणतीत,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.बच्चू कडूंना फोन केल्याच्या फडणवीसांच्या विधानासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “अर्थात, म्हणजे कशा प्रकारे, काय रितीने सुरु होतं हे कळतंय ना. कोणाचे आदेश पाळले जात होते, कोणाचा शब्द अंतिम असतो, कोणाच्या इशाऱ्यावर कोण चालतं हे त्यांच्याच शब्दात महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहे”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने