“…तर चित्रपटसृष्टी संपेल” ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा इशारा; बिकिनी वादावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “बॉलिवूड हे नेहमीच…”

मुंबई: शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादात अडकलं आहे. गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून वाद सुरू झाला. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी घेतली होती. दोन आठवड्यांपासून सुरू असलेला हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. बॉलिवूडमध्येही काही जण गाण्याला विरोध करत आहेत, तर काही पाठिंबा देत आहेत, अशातच ज्येष्ठ अभिनेत्री आखा पारेख यांनी या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल प्रतिक्रिया दिली.



एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना आशा म्हणाल्या, “चित्रपटाचा मुख्य हेतू मनोरंजन करणे आहे आणि अभिनेत्रीने काय परिधान केले आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. सद्या चित्रपट फार चांगली कामगिरी करत नसल्याने बॉलिवूडची परिस्थिती बिकट होत आहे. करोनानंतरच्या काळात परिस्थिती आधीच खूप वाईट आहे आणि त्यातच बॉयकॉट ट्रेंडमुळे आणखी नुकसान होत आहे. असंच राहिल्यास चित्रपटसृष्टी संपेल,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात नाहीत, याबद्दलही आशा पारेख यांनी चिंता व्यक्त केली. “जर चित्रपट फ्लॉप होत राहिले तर दुसरा चित्रपट कसा बनणार?” असं त्या म्हणाल्या. तसेच त्यांच्या काळात बिकिनीवरून कोणतेही वाद व्हायचे नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. “लोकांची विचार करण्याची क्षमता कमकुवत होत चालली आहे, लोक खूप संकुचित मानसिकतेचे होत आहेत, हे खूप चुकीचं आहे. शिवाय बॉलिवूड हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलंय,” असंही आशा पारेख म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने