शिंदे गटाच्या हमरीतुमरीत फसले आदित्य ठाकरे; अजित पवार धावले अन्...

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मागील अधिवेशनाला शिवसेनेतील बंडाची पार्श्वभूमी होती. मात्र आता हे थांबलं आहे. आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही मैदानात उतरले आहेत. त्यानुसार या अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील नागपुरात दाखल झाले आहेत. आज विधानसभेत आदित्य ठाकरे आणि शिंद गटात हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं.विधानसभेत आज युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते शंभुराज देसाई यांच्यात हल्ला प्रतिहल्ला झाला. त्यात अजित पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर गुलाबराव पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.



त्याचं झालं असं की, आदित्य ठाकरे यांनी मुंबई-पुणे रस्त्यावरील लाईटची समस्या मांडली. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एक रस्ता असा आहे जिथे ४० लोक रात्री आणि दिवसा पळून गेले. तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत आहे. त्या रस्त्याचा दर्जा सरकारने चेक करावा, तो रस्ता बनला की, त्यावरून धावता येईल आणि गुवाहाटीला जाता येईल.यावर शंभुराज देसाई म्हणाले की, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्नच आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. त्याच उत्तर मी दिलं आहे. तसेच सुरतच्या रस्त्याची आदित्य यांना काळजी आहे. जे काही शिल्लक सेनेते आमदार शिल्लक आहेत, त्यांना त्या रस्त्याची गरज पडू नये, तेवढी काळजी घ्या, असा सल्ला देसाई यांनी दिला.

दरम्यान यावर अजित पवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, शंभुराज देसाईंना मंत्री म्हणून उत्तर देण्याचा अधिकार आहे. मात्र विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणे मंत्र्यांचं काम आहे. सभागृह चालविण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्याची असल्याचं ते म्हणाले.त्यानंतर या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी सुरतचा प्रश्न, गुवाहाटीचा प्रश्न का उपस्थित केला? यांना डिबेट करायचं तर दाखवून देतो मातोश्रीचे रस्ते कसे आहेत. तुम्ही सुरतला कसे गेले, अन् गुवाहाटीला कसे गेले हे का विचारता? गेले.. गेले तुम्ही...संपला आता विषय तुमचा अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा समाचार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने