नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या कथित भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनातही भूखंड घोटाळा गाजला. आता यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन का धारण केलं, असा सवालही उपस्थित केला.
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहे. केंद्र सरकारमधील अनेक लोकांना या घोटाळ्याबाबतची कागदपत्र आम्ही सुपूर्द केली आहे. ते योग्य ठिकाणी पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी घाईने दिल्लीत आले होते. का आले माहित नाही, पण या विषयावर त्यांची इथे चर्चा झाली असेल. मुख्यमंत्र्यांनी ११० कोटींचे भूखंड केवळ दोन कोटीत आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिल्याचा आरोप राऊत यांनी केलं. हे भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव ठेवण्यात आले होते, असंही ते म्हणाले.
दरम्यान न्यायालयाने देखील यावर ताशेरे ओढले आहे. मात्र मागील २४ तासात याप्रकरणी न्यायालयाचे समाधान झाले असेल. मात्र तो भ्रष्टाचार आहे. अण्णा हजारे गप्प का, असा प्रश्न मी विचारत नसून समाजमाध्यमांवर विचारला जातो. या महाराष्ट्र सरकारने बोहणीचा ११० कोटींचा भ्रष्टाचार केला. गरिबांना घर मिळाली नाही. मात्र मुख्यमंत्री सारवासारव करतात. मोदींच्या विचारधारेची ही फसवणूक आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.