“दबंग’च्या प्रदर्शनानंतर अरबाज…” मलायकाने सांगितलं घटस्फोट होण्यामागचं खरं कारण

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायकाने खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. सोमवारी मलायकाच्या या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि या एपिसोडमध्ये मलायकाची मैत्रीण फराह खानने गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. या शोमध्ये मलायाकाने तिचं लव्ह लाइफ, घटस्फोट आणि खासगी जीवनाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ज्यात अरबाज आणि मलायकाच्या नात्यात कधी दुरावा आला हे सांगितलं आहे.मलायका अरोराने ‘मूव्हिंग इन विथ मलायका’मध्ये फराह खानशी बोलताना मलायकाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. डिज्नी प्लस हॉटस्टारवर सुरू झालेल्या या शोमध्ये मलायकाने पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानचं कौतुक केलं आहे. अरबाज खान एक अशी व्यक्ती आहे की प्रत्येक वेळी माझ्याबरोबर खंबीरपणे उभी राहिली असं तिने म्हटलं आहे. पण नात्यात सर्वकाही ठीक सुरू असताना मलायाका आणि अरबाजमध्ये वादाची ठिकाणी नेमकी कशी आणि कधी पडली याचा खुलासा मलायकाने केला आणि घटस्फोटाचं खरं कारणही स्पष्ट केलं.



अरबाजबरोबरच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दल बोलताना मलायका म्हणाली, “त्यावेळी मी तरुण होते. पण आता मी खूप बदलले आहे असं मला वाटतं. त्यावेळी मला आयुष्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि मला हवा असलेला स्पेस मला मिळत नाहीये असं मला वाटू लागलं होतं. मला पुढे जायचं होतं. त्यावेळी मला वाटलं की यावर फक्त एकच उपाय आहे की काही बंधन मी तोडून टाकू. त्यामुळे आज मी एक चांगली व्यक्ती आहे असं मला वाटतं.”मलायका पुढे म्हणाली, “आज आम्ही जे काही आहोत त्यासाठी एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम आहे. आमचा एक मुलगा आहे. ही एक अशी गोष्ट आहे, जी कधीच बदलणार नाही. पण मला आता जाणवतं की आम्ही दोघंही पूर्वीपेक्षा चांगल्या व्यक्ती आज आहोत. ‘दबंग’च्या प्रदर्शनापर्यंत अरबाज आणि माझ्या नात्यात सर्वकाही ठीक होतं पण नंतर आम्ही खूपच नकारात्मक आणि रागीट होतं गेलो. छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले.”

मलायकाच्या या बोलण्याला फराह खाननेही दुजोरा दिला. ‘दबंग’च्या प्रदर्शनानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. अरबाजपासून वेगळी राहत होती त्यावेळीच्या आठवणींना उजाळा देत मलायका म्हणाली, “मला आठवतंय तू, करण आणि तुम्ही सर्वांनी त्यावेळी मला सांगितलं होतं. जे काही होईल, जसंही होईल, आमचं तुझ्यावरील प्रेम कायम राहील. हे मी कधीच विसरू शकत नाही. मी हे कायम लक्षात ठेवेन. मी आनंदी आहे.” दरम्यान मलायका आणि अरबाजने १९९८ मध्ये लग्न केलं होतं आणि २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने