'देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीपदही जाईल', भाजप नेत्याचा घरचा आहेर

मुंबई: पंढरपूरचं कॉरिडोअर करण्यावरून भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. या संबधी महाराष्ट्रात येत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या बड्या नेत्याने चॅलेंज दिलं आहे. तर देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर तुम्ही उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, अशा शब्दात फडणवीस यांना इशाराही देण्यात आला आहे. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केली आहे.पंढरपूरमधील विकास आराखड्याला स्थानिकांनी विरोध केलाय. यासंबधी स्थानिक नागरिकांनी मुंबईत माझी भेट घेऊन या विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे. भाजपाचे नेते असतानाही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बेधडक बोलणाऱ्या स्वामी यांनी पंढरपुरात येऊन फडणवीस यांना इशारा दिला आहे.






काहीही झालं तरी पंढरपूरचं कॉरिडोअर होणार, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतलीय. यालाच सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिलं आहे. यासंदर्भात बोलताना स्वामी म्हणाले की, मी म्हणतोय, हा विकास प्रकल्प होणार नाही. फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. एवढी घाई कशासाठी आहे. तुम्हाला विकास करायचाच असेल तर दूषित चंद्रभागा नदी शुद्ध करा, इकडे विमानतळ बांधा, सोई सुविधा करा, इतके लोक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा. या कॉरिडोरसाठी कोणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.त्याचबरोबर त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरतीही हल्लाबोल केला आहे. हे सरकार अनैतिक आहे. महाराष्ट्रात तोंडमोड करून बनवलेल हे सरकार आहे अशी घणाघाती टीका सुब्रमण्यम स्वामीयांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने