मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला असताना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात वेवजीप्रमाणेच झाई गावात गुजरात राज्याने ३० वर्षांपूर्वी घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता काँग्रेसने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपावर जोरदार टीका केली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, ‘भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का? महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी भाजपाच्या कर्नाटक सरकारनंतर आता गुजरात सरकारही पुढे! महाराष्ट्राबाबत एवढा आकस का? शिंदे फडणवीस सरकार कधीपर्यंत गप्प बसणार?’ असा सवाल केला आहे.
येथील ग्रामपंचायतीने झाईतील ३६ पैकी ३४ कुटुंबांना तीन लाख रुपये आणि घरपट्टीचे प्रलोभन दाखवून गुजरातेत समाविष्ट करवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन कुटुंबांनी त्यास नकार दिल्याने गुजरातमधील सरकारी यंत्रणांनी कारवाईच्या नोटिसा पाठवल्याने खळबळ उडाली आहे.तलासरी तालुक्यातील झाई गावापासून गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील गोवाडा ग्रामपंचायतीची हद्द १५० ते २०० मीटर अंतरावर आहे. या दोन गावांमध्ये एक पूल आहे. मात्र, सीमादर्शक दगड खाजन जमिनीतील चिखलात गाडला गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.