महाराष्ट्र- कर्नाटक बससेवा सुरू, सौंदत्तीचे यात्रेकरू सुखरूप परतले

 कोल्हापूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात तणावामुळे आज एसटीची कर्नाटक भागात होणारी वाहतूक अंशतः बंद राहिली; तर सौंदत्ती यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना कर्नाटकातून पोलिस बंदोबस्तात सुरक्षितपणे महाराष्ट्र सीमेवर सोडण्यात आले. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व भाविक सकाळी सहाला सुखरूपपणे कोल्हापुरात दाखल झाले, अशी माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी दिली.गेल्या आठ दिवसांपासून कर्नाटक सीमा वरती तालुक्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून सीमा भागातील एसटी प्रवास पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार काही अंशी बंद ठेवला आहे. ‌याच काळात सौंदती यात्रेसाठी कोल्हापुरातून १४५ गाड्यातून सात हजारांवर भाविक सौंदती डोंगराला गेले होते. मात्र तणाव वाढला होता.



कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी ही सौंदती येथे जाऊन यात्रा मार्गावर एसटीचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी कर्नाटक पोलिस व प्रशासनाशी चर्चा केली व यात्रा संपल्यानंतर बंदोबस्तातच एसटी गाड्या भाविकांसह कोल्हापुरात आणण्यात आल्या.या गाड्यांसोबत एसटीचे अधिकारी व कर्मचारी ही सौंदती डोंगराकडे गेले होते. त्यांची एकूण चार पथके होती. हे सर्वजण आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले.कर्नाटक परिवहन मंडळाकडून महाराष्ट्रात गुरुवारी (ता. ८) परिवहन सेवा सुरू केली; पण महाराष्ट्रातून आज एसटी महामंडळाची एकही बस बेळगावकडे पाठविण्यात आली नाही.

आंतरराज्य परिवहन सेवा सुरू

दरम्यान, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याने दोन्ही राज्यांची आंतरराज्य परिवहन सेवा खंडित राहिली. तणाव निवळला असल्याने वायव्य परिवहन मंडळाने काही बसगाड्या महाराष्ट्रात सोडल्या. पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी या बस आज सकाळी धावल्या; पण त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने