‘पठाण’वाद पोहचला लोकसभेत; बसपा खासदाराने म्हटले सेन्सॉर बोर्डाला निर्णय घेऊ द्या

दिल्ली: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटावरून सुरू झालेला वाद वाढतनाच दिसत आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बसपा खासदार दानिश अली यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटले की, विरोध आणि बंदीचं एक नवं चलन सुरू झालं आहे. चित्रपटांबाबत सेन्सॉर बोर्डाला निर्णय घेऊ दिला पाहिजे.अली यांनी शून्यप्रहरात मुद्दा उपस्थित करत म्हटले की, “हे एक नवीन चलन आहे, सरकारमध्ये बसलेले लोक चित्रपटावर बंदीची मागणी करत आहेत. उलेमा बोर्डाच्या व्यक्तीनेही शाहरुख आणि दीपिका पदुकोणच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.”



चित्रपटाला मंजुरी देण्याचं काम सेन्सॉर बोर्डाने करावं –

याशिवाय त्यांनी म्हटलं की, “सनातन धर्म एवढा कमकुवत आहे का, की एका रंगाने तो धोक्यात येईल. इस्लामही एवढा कमकुवत नाही की एखादा चित्रपट त्याला धक्का पोहचवेल. सरकारने हे पाहीलं पाहिजे की एखाद्या चित्रपटाला मंजुरी देण्याचं काम सेन्सॉर बोर्डच करेल.”

नरोत्तम मिश्रासह अनेक नेत्यांनी चित्रपटावर बंदीची मागणी केली –

पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशमधील उलेमा बोर्डानेही इस्लामला चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आल्याबद्दल चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे.‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने