कर्नाटक सरकारविरोधात मए समितीचा 'चलो कोल्हापूर' नारा; मोठ्या संख्येनं मराठी बांधव कोल्हापूरकडं रवाना

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच उफाळला आहे. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक विधानसभेनं नुकताच केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीनं मोर्चाचं आयोजन केलंय.कर्नाटक सरकारच्या  दडपशाही विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं आज (सोमवारी) 'चलो कोल्हापूर'चा  नारा दिला होता. या मोहिमेस बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातून सुरुवात झाली. खानापूर आणि बेळगाव ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं मराठी भाषिक कोल्हापूरकडं रवाना झाले आहेत.



कोगनोळी नाक्यापासून एकत्रित रित्या रॅलीसह कोल्हापूरकडं रवाना होऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं जाणार आहे. सुवर्णविधानसौध इथं भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या महामेळाव्याला यंदा कर्नाटक प्रशासनानं पोलिसी दडपशाही वापरून रोख लावला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने