दिल्ली: प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, जो भारताला आपलं मानतो. प्रतिकूल परिस्थितीत त्याचा स्वीकार करतो. एखादी व्यक्ती कोणतीही भाषा बोलत असली, तरी कोणत्या धर्माचं पालन करते किंवा ती नास्तिक असली तरी देशाला आपलं मानते, ती हिंदूच आहे, असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.भारतातील लोकांना विविधतेत एकतेच्या संस्कृतीत राहायचं आहे आणि या दिशेनं प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचा आणि भाषेचा अभिमान असला पाहिजे. परंतु, भारतीयांनी संघटित होऊन भारताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आधी देश प्रथम येतो. आम्ही आरएसएसच्या स्वयंसेवकांना हेच शिकवतो, असं त्यांनी सांगितलं.
भारताच्या G20 अध्यक्षपदाचं कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, आज संपूर्ण जग भारताकडं एका चांगल्या उद्देशानं पाहत आहे. संपूर्ण जगाला एकत्र आणण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जगाला आता भारताची गरज आहे. भारताचं नाव जागतिक चर्चेत असून भारत जगाचं नेतृत्व करण्यास तयार आहे. भारताला G20 चं अध्यक्षपद मिळणं ही सामान्य गोष्ट नाहीये. पण, ही फक्त सुरुवात आहे. कारण, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. संपूर्ण समाजाला भारताला 'विश्वगुरू' बनवण्याच्या दिशेनं काम करायचं आहे, असंही त्यांनी संघाच्या मुख्यालयात स्पष्ट केलं.